गडचांदूर प्रतिनिधी:-
आषाढी एकादशी निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही येथील 40 वारकरी विठ्ठलाच्या दर्शनाला पंढरपूरला गेले.याच पार्श्वभूमीवर गडचांदूरच्या विठ्ठल मंदिरात सुद्धा विठू नामाचा गजर करण्यासाठी मोठ्याप्रमाणावर भाविकांनी हजेरी लावली होती. सरुबाई गाडे यांनी 1984 मध्ये बांधलेल्या या पुरातन विठ्ठल मंदिरात पहाटेच्या सुमारास हरी भक्त पारायण दिपक महाराज पुरी,प्रफुल्ल उपाध्ये गुरूजी,अंबादास घोटकर,उद्धव पुरी,प्रा.संगीता पुरी,बळवंत शिंगाडे यांच्या हस्ते महाभिषेक व पूजा पार पाडली.त्यानंतर मोठ्यासंख्येने भाविकांनी गर्दी करत भगवान पांडूरंग व रुख्मिनी मातेचे दर्शन घेतले.दिवसभर पावसाची संततधार सुरू असतांनाही महिला,पुरूष विठ्ठलाच्या नामघोषात मग्न झाल्याचे पहायला मिळाले. "विठ्ठल नामाची शाला भरली" महिलांच्या या भजनाने सर्वजण तल्लीन दिसत होते.दिवसभर याठिकाणी हरी नामाचा गजर करण्यात आला.
जि.प.चे माजी सभापती अरूण निमजे,नगरसेविका मिनाक्षी एकरे यांच्यासह अनेकांनी सुख,समृद्धी व उत्तम आरोग्यासाठी विठ्ठलाला साकडे घातले. सायंकाळी धुपारती व हरिपाठ करण्यात आला.यावर्षी मंदिर व्यवस्थापनाने टिनचे शेड उभारल्याने पुजा, आरती,भजनासाठी चांगली बैठक व्यवस्था करण्यात आल्यामुळे भाविक उत्साही दिसून आले.मंदिर परिसरात सर्वत्र जय हरी विठ्ठलाचा गजर व जयघोष ऐकू येत होता.एकुणच आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
0 टिप्पण्या