Subscribe Us

header ads

देशाला स्वातंत्र्य मिळाले, आम्हाला कधी ? थेट मुख्यमंत्र्यांनाच प्रश्न !

गडचांदूर :-
'हर घर तिरंगा,घर घर तिरंगा' या अभियानांतर्गत संपूर्ण भारतात 'आज़ादी का अमृत महोत्सव' मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष होत आहे.मात्र आजही चंद्रपूर जिल्ह्यातील अतिदुर्गम क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोरपना तालुक्यातील औद्योगिक शहर गडचांदूर येथील बंगाली कॅम्पवासी गेल्या अंदाजे 40 वर्षांपासून अक्षरशः निर्वासितांचे जीवन जगत आहे.वीज,रस्ते,नाली, घरकुल,अंगणवाडी अशा जीवनावश्यक व मुलभूत सुविधांपासून हे कुटुंब वंचित आहे.येथील माणिकगड सिमेंट कंपनी विकासामध्ये आडकाठी आणून मुलभूत सुविधांपासून वंचित ठेवत असल्याचे आरोप बंगाली कॅम्पवासीयांकडून होत आहे.हक्काचे जीवन जगता यावे यासाठी यांनी अनेकदा संबंधितांचे उंबरठे झिजवले.खाल पासून वरपर्यंत सर्वांपुढे व्यथा मांडली मात्र दरवेळी निराशाच पदरी पडली.मुलभूत सुविधा पुरविण्यात शासनप्रशासन सपशेल अपयशी ठरल्याची जळजळीत भावना येथील नागरिक करतात मात्र कोणालाही पााझर फुटत नसल्याची खंत व्यक्त होत आहे.'देशाला स्वातंत्र्य मिळाले आम्हाला कधी' ? असा प्रश्न आता बंगाली कॅम्पवासीयांनी थेट मुख्यमंत्र्यांना विचारला असून मदतीची याचना यांच्याकडे केली आहे.बंगाली कॅम्पच्या जागे विषयीचे प्रकरण न्ययायप्रविष्ट आहे हे मात्र विशेष.
शहरातील इतर प्रभागातील नागरिकांना मिळत असलेली सुविधा आम्हालाही मिळावी अशी भावना सदर कॅम्पवासी व्यक्त करतात.अनेक निवडणूका आल्या आणि गेल्या,दरवेळी विविध पक्षाच्या पुढाऱ्यांनी आश्वासनाचे लॉलिपॉप देऊन मते मागितली. मात्र निवडणूक संपली की कोणीही यांच्याकडे ढुंकून पाहत नाही.यामुळे आजतागायत परिस्थितीत बदल घडला नाही.वीज पुरवठा नसल्याने येथील नागरिक लहानलहान मुलांना घेऊन किट्ट अंधारात दिवस काढत आहे.विषारी प्राण्यांचा धोका पत्करत असताना सर्पदंशाने काहींना जीव सुद्धा गमवावा लागला आहे.इतकी वर्षे लोटुनही येथील कुटूंब अक्षरश: रानटी जीवन जगत असल्याचे विदारक चित्र आहे.कोणत्या तरी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन सकारात्मक तोडगा काढण्याचे प्रयत्न करणे गरजेचे आहे.जेणेकरून यांना मुलभूत सुविधा मिळेल.मात्र असे होत नाही,हीच वास्तविकता आहे. विकासाचे ढिंडोरे पिटणाऱ्यांना बंगाली कॅम्पवासी, सनसनीत चपराकच असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.मोठ्या तळमळ आणि आशेने या त्रस्त कुटुंबांनी राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साद घातली असून सकारात्मक उपाययोजना करण्याची मागणी वजा कळकळीची याचना 'कोरपना LIVE' च्या माध्यमातून केली आहे.आता मुख्यमंत्री पर्यंत यांचा आवाज पोहोचणार का ? आणि ते याला किती गांभीर्याने घेतात ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
                      -------//-------
                                               'कोरपना LIVE'
                                                   मुख्यसंपादक
                                                 सै.मूम्ताज़ अली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या